केडीसीसी बँकेच्या मोबाइल बँकिंग एपचे रवी निंबाळकर या खातेदारांना लॉन्चिंग करताना नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ . यशवंतराव थोरात, बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील.
Livve Dinmaan Online
कोल्हापूर - सर्व सुविधांनी युक्त शहरी जीवन आणि सुविधांपासून वंचित ग्रामीण जीवन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. परंतु; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावातील शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवून शहर आणि गाव हि दरीच कमी केली आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी काढले.
बँकेच्या केडीसीसी मोबाईल बँकिंग आणि अद्ययावत वेबसाइटचे लॉन्चिंग डॉ . थोरात यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते.
भाषणात डॉ. यशवंतराव थोरात पुढे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी बँकेच्या किसान क्रेडिट कार्ड वितरणाच्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा होतो. त्यावेळी अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी ही बँक नफ्यात आणून मगच तुम्हाला बोलावू , असा शब्द मला दिला होता. श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांच्या पाठबळावर बँकेने घेतलेली गरुडभरारी लौकिकास्पद आहे. या बँकेने आर्थिक निकष तर पार केलेले आहेत, यापुढे सामाजिक निकष पूर्ण करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दूरगामी सुधारणा या लोकशाही पद्धतीने केल्या पाहिजेत, यावर माझा विश्वास आहे. माझा हा विश्वास या बँकेने सार्थ करून दाखविला आहे. पाच वर्षांपूर्वी हे संचालक मंडळ सत्तेवर येताना असलेला १३० कोटीचा संचित तोटा भरून काढून आजघडीला बँक १३६ कोटींच्या ढोबळ नफ्यात आणली आहे, हे त्याचेच द्योतक आहे. श्री मुश्रीफ यांच्या पुढच्या संचालक मंडळात मी अध्यक्ष नसेल, या वक्तव्याचा संदर्भ घेत डॉ . थोरात म्हणाले, श्री मुश्रीफ निवडणुकीला उभे राहणार आहेत की नाहीत, ते अध्यक्ष असतील की नसतील याच्याशी मला काही देणे- घेणे नाही. परंतु, त्यांनी या बँकेच्या माध्यमातून करून ठेवलेले काम हे पिढ्यानपिढ्याच्या कल्याणाचे आणि मार्गदर्शनपर आहे, म्हणूनच त्यांचे अभिनंदन.
बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, प्रामुख्याने शेतकरीच ग्राहक असलेल्या या बँकेने तंत्रज्ञानात गरुडभरारी घेतली आहे. आजघडीला अडीच लाखाहून अधिक शेतकरी खातेदार किसान क्रेडिट कार्डचा वापर करीत आहेत. येत्या दोन वर्षात या बँकेला देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुढे आणू, असा विश्वासही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. नोटाबंदीमध्ये रिझर्व बँकेने जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा स्वीकारल्या नाहीत. नोटा बदलून देण्याचा अधिकार सर्व बँकांना दिला, परंतु जिल्हा बँकांना दिला नाही. या अन्यायाचा सगळ्यात मोठा फटका जिल्हा बँकांना पर्यायाने शेतकऱ्यांना बसला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शेतकरी खातेदार रवी निंबाळकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची जननी असलेल्या या बँकेचे जिल्ह्यातील पिढ्यानपिढ्याशी ऋणानुबंध आहेत.
या डिजिटल सुविधा मिळणार.....
जिल्हा बँकेच्या केंद्र कार्यालयासह सर्वच म्हणजे १९१ शाखांमधून KDCC MOBILE BANK या ॲपच्या माध्यमातून या सुविधा मिळणार ......
● जिल्ह्यातील आठ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना शाखेत न येता डिजिटल व्यवहार करता येणार.
● खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, खाते उतारा पाहणे, चेकबुक मागणी, मुदतबंद व रिकरिंग ठेव खाते उघडणे, बँकेतर्गत इतर खात्यामध्ये रक्कम वर्ग आदि व्यवहार करता येणार.
● NEFT व IMPS या सुविधांद्वारे इतर बँकांच्या ग्राहकांच्या खात्यावर सुद्धा रक्कम वर्ग करता येणार आहे.
● UPI व Bharat Bill Payment System याद्वारे मोबाईल फोन, विज बिल, पाणी बिल, मोबाईल व डिश टिव्ही रिचार्ज रक्कमा अदा करता येणार.
●जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह ग्राहक, नोकरदार व इतर घटकांना या सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार .
सहकारच गरिबांचा वाली.....
डॉ यशवंतराव थोरात म्हणाले, सहकारात घुसलेल्या अपप्रवृत्तीमुळे सहकारच रद्द करावा असा सल्ला मी वैद्यनाथन यांना दिला होता. त्यावेळेस त्यांनी मला तीन महिने सुट्टी घेऊन भारत फिरून मग अभ्यासानंतर म्हणणे देण्याचा सल्ला दिला. तीन महिन्याच्या देश फिरून केलेल्या अभ्यासानंतर मी त्यांना म्हणालो सहकार रद्द करावा वाटण्याजोगी कारणे अनेक आहेत. परंतु, फक्त एकच कारण असे आहे की सहकार टिकला पाहिजे. ते म्हणजे सहकाराशिवाय गोरगरीब शेतकऱ्याला कुणीच वाली नाही.
खंत मुश्रीफांची........
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँक शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज दोन टक्के इतक्या अल्प व्याजदराने देते तर एक लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी देते. गोरगरीब शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवूनच बँक वार्षिक सरासरी ३५ कोटी रुपयांचा तोटा सहन करून बँक शेती कर्ज पुरवठा करते. असे असले तरी जिल्ह्यातील ८० टक्के ठेवी ह्या व्यापारी बँकांमध्ये ठेवल्या जातात, याबद्दल खंत वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच कारखानदार, व्यापारी, उद्योगपती, छोटे-मोठे व्यवसायिक या सगळ्यांनीच या प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संचालक मंडळातील खासदार संजय मंडलिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे, आर. के.पोवार, अनिल पाटील, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने , आसिफ फरास यांच्यासह नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक आदी प्रमुख उपस्थित होते
प्रास्ताविकात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी . माने यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी मोबाईल बँकिंग व अद्ययावत वेबसाईटबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सौ. स्वाती रवींद्र कुंभार यांनी केले. आभार संचालक अनिल पाटील यांनी मानले .
Comment: